संत, महात्म्ये या शब्दातच खरी ताकद आहे ती निःस्वार्थ वृत्तिच्या लक्षणांची. परंतू आजच्या काळात अज्ञानापोटी अनेकांनी या शब्दांचा पाहिजे तसा अर्थ लावलेला दिसतो. कोणी सोईनुसार उपासना करतात. तर कोणी प्रसिद्धिसाठी उपासनेचा बाजार मांडताना दिसतात. काहिंनी तर स्वतःला संत म्हणवून घेण्यात धन्यता मानलेलि दिसते. वास्तविक संत होणे ही काही सोपी गोष्ट नाही. समाजातील आस्तिक, नास्तिक, टवाळखोर, टिंगलखोर यांच्या कडून होणारा अपमान, अवहेलना, कुचेष्टा सहन करून सुद्धा त्या जड जीवांचे कल्याण चिंतितो. भले करतो तो संत. शेगांवच्या गजानन महारांजावर ते सगूण अवस्थेत असताना अनेकांनी टिका,ऊपमर्द केल्याची उदाहरणे श्री गजानन विजय ग्रंथात आढळतात. पण त्यांनी कोणावर राग धरला नाही. कोणाचेही नुकसान केले नाही. केले ते फक्त सत्कर्मच. उच्चकोटीचा संत तो, तो कशाला सामान्यांच्या सामान्य बुद्धितुन जन्मलेल्या कृत्यांकडे लक्ष देईल बरे. परंतु महाराज आज निर्गुण अवस्थेत असले तरी अज्ञानी लोक त्यांच्या दिगंबर अवस्थेतील व चिलिम ओढण्याच्या स्थितीतील छायाचित्रे पाहून चेष्टा करताना दिसतात. अशा ठगांना वेळीच ठणकवणे हे श्रद्धावंतांचे कर्तव्यच आहे. त्यांना अभ्यासाने समजाविले पाहिजे. बुवाबाजीच्या, क्षणैक सुखाच्या मागे लागु नका. वास्तव जाणून घ्या. मगच विचार अर्थपुर्ण व्यक्त करा. शब्द पांडित्य, भूलथापांना थारा देऊ नका. स्वानुभव घ्या आणि मगच एखाद्या संताविषयी आपले मत व्यक्त करा कारण श्रींनी म्हटलंय, संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वांत तेथे स्वानुभव पाहिजे.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com