मंदिर असो की मशीद दोन्हीची रचना निराळी. मात्र बांधकामाचे साहित्य एकच असते. मग भेदभाव कशाला. ईश्वर किंवा अल्ला ही त्या विधात्याची दोन वेगवेगळी नावे आहेत. भगवद्गीता, कुरआन मध्ये मानव जातीचे कल्याण म्हटले आहे. शेगांवच्या संत श्री गजानन महाराजांनी हेच तर सांगितले आहे. महेताबशा फकीर होते. तर महाराज परमहंस संन्यासी. दोघांचा अवतार मानव जातीच्या कल्याणासाठी. महाराजांच्या आज्ञेने महेताबशा पंजांबात निघून गेले. त्यावेळी गजानन स्वामींनी केलेला उपदेश आजही विचार करायला लावतो. ते म्हणाले, यवनजातीत जन्मून काही न केला उपयोग जाण यवनांचे आडदांडपण नाही अजून गेले रे. या आडदांडपणानी तत्वघात होईल जाणी मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. ऐसा मिळता इशारा महेताबशा तोषला खरा साधुच साधूच्या अंतरा जाणताती निःसंशय. या कथेतून आपणही बोध घ्यायला हवा तो सर्व धर्म समभावाचा. आजही श्रींची उपासना करणारे विविध धर्मीय नागरीक आहेत. श्रींच्या नामस्मरणात रममाण आहेत. सर्वांना सामावून घेत श्री गजानन स्वामींच्या उपदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून तर गजाननाचे नाम घेऊयात सर्वांसोबत राहूयात.म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते. श्रीराम जयराम जय जय राम.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com